तुकाराम भाऊराव तथा अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित, 'अण्णा भाऊ साठे' (चरित्र, चेतना, चिंतन) हा आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या लेखणीतून साकारलेला हिंदी भाषेतील चरित्रग्रंथ होय. अण्णांची विश्वात्मक भूमिका आणि लोकधुरिणत्व या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर नेमक्या बिरुदावलीतून प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी या ग्रंथाचा करून दिलेला हा परिचय.... ..........................
अण्णा भाऊ साठे यांच्या या चरित्र ग्रंथातून त्यांचे चरित्र समोर येते. त्यांच्या साहित्याविष्कार आणि जीवनविषयक दृष्टिकोनाचे, स्वीकृत वैचारिक व्यूहाचे, भारतीय आणि वैश्विक पातळीवर लोकसापेक्षतेने चिंतन घडते. वैचारिक व्यूहानुसार समग्र समाज परिवर्तनात्मक चळवळीला चेतना मिळते असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून, सोनग्रा यांनी या ग्रंथाचा नेटका आविष्कार घडवला आहे.
वैचारिक व्यूह आणि साहित्य यांचे मर्मग्राही तरी आस्वाद, परिशीलन करण्याची ताकद सोनग्रा यांच्या जीवनसरणीत आहे. त्यामुळेच समजाभिमुखतेने अण्णांच्या कवी, शाहीर, कलावंत, साहित्यिक, साम्यवादी अशा व्यक्तिमत्त्वाच्या चेतना निर्माण होतील, असे विवेचन आणि विश्लेषण या ग्रंथात असल्याचे दिसून येते.
सर्व स्तरांतील, विशेषतः उच्चभ्रू आणि कार्पोरेट जगतातील वाचकांचे, वेगवान सरणीतही ग्रंथाकडे सहज लक्ष जाईल आणि ग्रंथ चाळता चाळताही अंतर्मुख होऊन, मानवी जीवनाचे विश्वात्मक समतामूल्य दृष्टीने चिंतन घडणे अपरिहार्य होईल; अशा योजकतेने कॉफ़ी शॉप बुकसारखी मांडणी असलेले हे पुस्तक आहे. इतिहास आणि वर्तमानाची नेमकेपणाने सांगड घालत, मांडणी करण्याचा अभिनव प्रयोग सोनग्रा यांनी केला आहे. साम्यवादी विचारांची मानवतावादी श्रीमंती या ग्रंथातून सहज प्रदर्शित करण्याचे कौशल्य त्यांनी उपयोजिले आहे. लोकशाहीर अण्णांची सूचक आणि परिवर्तनाचे आवाहन करणारी वाचणे, त्यांची वैचारिक निष्ठा व्यक्त करणाऱ्या भावात्मक व काव्यात्मक पंक्ती उपयोजित करून; अण्णांच्या समताधिष्ठित मानवी प्रेममूलक वैश्विक वैचारिकतेकडे लेखकाने वाचकांना आकर्षित करून घेतले आहे.
अण्णांचा वैचारिक पिंड संस्कारित करणाऱ्या विभूतींची चरित्रात्मक आणि तत्त्वज्ञानात्मक माहिती सुरुवातीला देण्यात आली आहे. त्यात कार्ल मार्क्स, डॉ. श्रीपाद अमृत डांगे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव आणि प्रेरणेचा सूचक उल्लेख औचित्यपूर्ण आहे.
अण्णा भाऊ साठे विश्व पातळीवरील साहित्यिक आहेत; असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा विश्वाला त्यांची विश्वात्मकता आकलित होण्यासाठी; त्यांच्या साहित्याचे भाषांतर, माध्यमांतर होणे अपेक्षित असते. भारतीय परिप्रेक्षात हिंदी आणि इंग्रजी हे पर्याय आपल्यासमोर उभे राहतात. साम्यवादासारखा युगप्रवर्तक आणि चिरंतन आत्मशुद्धीचा विचार कोणत्याही तत्वज्ञानाप्रमाणे देश, काळ, भाषा, मानवी पृथक, पृथक समूह, वंश यांना ओलांडून पलिकडे जातो. असे तत्त्वज्ञान जीवनात अनुसरणे हे त्या मानवी अस्तित्वातील शहाणपण विशेष मोलाचे होते. हे ओळखून, वैश्विक विचार प्रसाराच्या साध्यासाठी सोनग्रा यांनी अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र, चेतना आणि चिंतन या विषयीची चर्चा यातून केली आहे.
अण्णांचा ज्या महामानवांशी संबंध आला आणि अण्णा प्रभावित झाले; त्यांची चित्रप्रदर्शनीच रतनलाल सोनग्रांनी मांडली आहे. त्यात शाहीर गवाणकर, शाहीर अमरशेख, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, अवतार कृष्ण हंगल आदींचा समावेश होता. या पुस्तकात अनेकांच्या शब्दांतून अण्णा उलगडले आहेत. त्यात भगवान वैराट, कादरखान, बाबूराव बारस्कर, ए. के. हंगल, हिरा जनार्दन, रामसागर पांडे, श्रीराम रानडे, नाना पळसीकर, मगजी सोनग्रा, डॉ. वैशाली भालसिंग, डॉ. दाऊजी गुप्ता, डॉ. लखनलाल सिंह, बाबूराव गुरव, प्रकाश आंबेडकर आणि अशी अनेक नावे आहेत. या ग्रंथात अण्णांच्या कथा, कविता, चित्रपट कथा, अंश, भाषणे इत्यादी हिंदीत रूपांतरित करून मांडल्या आहेत.
निवड आणि मांडणी यातून अण्णा भाऊ साठे यांचे विश्वसाहित्यिक क्रांतिकारी, साम्यवादी, परिवर्तनवादी असे व्यक्तिमत्व स्पंदित होत जाते. अतिसामान्य जनसमूहातून एक महान क्रांतीवीर, 'बदलो दुनिया मारो घाव | कह गये आंबेडकर भीमराव', 'किसानो आओरे, लो हाथ में एकता की मशाल, मजदुरो उडाओ आकाश में, लाल गुलाल...|' लडते-लडते मंगल तारा, लाल आकाश में फैलेगा, जनक्रांती का सूरज नभ में, सज-धजकर छा जायेगा। आणि समतावाद्यांना देत लाल गुलालाची उधळण करतात. अण्णांचा तोच त्वेष, तीच हाक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ऐकू येते. मराठी भाषिक कष्टकऱ्यांच्या कळवळीने त्यांची ही हाक असते - 'जय महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र का गान, गायें सर उठाकर, बुलंद आवाज में मिलायें तान...।' मुळात मराठी भाषेतून उर्जस्वल स्वरात अण्णांनी मारलेल्या ह्या परिवर्तनाच्या हाका, सोनग्रा यांनी हिंदी भाषेतून तेवढ्याच ताकदीने पुनरुज्जिवित केल्या आहेत. याचे कारणही तसेच आहे. अण्णांना समजून लोकांपुढे मांडताना, सोनग्रा अण्णांचे सहानुभूत होतात. त्यांच्या हृदयाशी संवाद साधत, ग्रंथमांडणीच्या रुपात जनसामान्य मानवतावादी, परिवर्तनवादी, वर्गविहीन, जातीधर्मविहीन समाजनिर्मितीवादी यांच्यापुढे मांडतात. मने चेतवतात, अंतर्मुख होऊन चिंतन करण्यास भाग पाडतात. अण्णांशी सहानुभूत होऊन परिवर्तनाची हाक देतात.
मुळात रतनलाल सोनग्रा हे हिंदी भाषा आणि वाङ्मयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा विनियोग त्यांनी अण्णांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाला जगभर पोहोचविण्यासाठी केला. या त्यांच्या औचित्याला दाद दिली पाहिजे. रणझुंजार अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील चित्रकथा 'वारणा ते व्होल्गा' या 'स्नेहबंध' प्रकाशित आणि आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी लिहिलेल्या, अण्णाभाऊंच्या साहित्य आणि चरित्रविषयक जीवनकहाणीचा हिंदी आविष्कार, या ग्रथांच्या रूपाने आचार्यांनी घडवला आहे. याबाबत भूमिका' मांडताना ‘उस विशाल मुंबई में काम खोजते खोजते, मजदुरी करते करते, जिने के लिये मर कर श्रम करते हुए... अण्णा भाऊ की 'लाल बावटा' (साम्यवाद) से पहचान हुई’.
अण्णांच्या चित्रकथेतील मुखपृष्ठांच्या कथा सांगताना आचार्य लिहितात, 'दैन्य, दारिद्र्य, दास्य, दुराभिमान और देव पर मात करनेवाले अमर पात्र, अण्णाने निर्माण किए. अण्णा भाऊ की कलम में स्त्री जाती के बारें में अपूर्व आदर है. उनकी नायिकाएँ परिस्थितीसे लढती है, जखमी होती है... नष्ट होती है, लेकीन कभी पराभूत नहीं होती.’ या पुस्तकात सोनग्रा अण्णांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाची बोलकेपणाने उकल करतात. आण्णांनी २० कादंबऱ्या, १२ कथासंग्रह, पाच लोकनाट्ये, शेकडो कविता-वीरगाथा-प्रेमकविता लिहिल्या आहेत. स्वतःच्या साहित्याविषयीचा आण्णांचा अभिप्राय सोनग्रा यांनी नोंदवला आहे. तो असा... ‘जो कलाकार जनता की कद्र करता है, जनता उसकी कद्र करती है, मैने यह पहले सिखा, और फिर लेखन करने लगा. मेरा अपने देशपर उसकी जनतापर और संघर्षपर अटल विश्वास है. यह देश सुखी और समृद्ध बने, यह समता फलेफुले- महाराष्ट्र भूमी.'
पुस्तक : अण्णा भाऊ साठे
लेखक : रतनलाल सोनग्रा
प्रकाशन : आरती सोनाग्रा
पृष्ठे : १२८
मूल्य : १००० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)